भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

भारतीयांच्या मनातील अटळ व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ....



                                             भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी pdf 
भारतीयांच्या मनातील अटळ व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ....
    महापुरुष जन्मास येतात त्यांच्या येण्यामागे काहीतरी कारण मिमांसा असते समाजाचा त्यांच्याकडे काहीतरी उद्दात हेतू असतो,त्यांचे आयुष्य लहानशा पणतीसारखे नसतेच,तर ते एखाद्या मशाली सारखे असते,अशीच एक मशाल भारताच्या राजकीय इतिहासात सतत तेवत राहिली ती नुसतीच तेवत राहिली नाही तर भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरून गेली,अशा या मशालीचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी वडील कृष्णा बिहारी व आई कृष्णादेवी यांच्या आदर्श शिक्षकांच्या पोटी एक रत्न म्हणून  जन्मास आले,परंतू ते रत्न न राहता आपल्या कार्यकर्तृत्वावर  भारतरत्न झाले.
  अटल यांचे बालपण बटेश्वर येथे गेले, हिंदी भाषेच्या विद्याविभूषित पित्याने या बाळ अटल यास बालपणीच राष्ट्रभक्तीचे बाळकडू पाजले,ग्वाल्हेर येथे पदवी शिक्षण घेतानाच राष्ट्रीय स्तरावर वाद-विवाद स्पर्धेत भाग घेऊ लागले.यातून त्यांच्यात आपल्या बोलण्यात प्रगल्भता,देशप्रेम,संघर्ष अशा बाबीवर तेज मिळाले,अन अशातच १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेऊन देशाभिमान जागृत केला.१९७७ मध्ये संयुक्त राष्ट्र्सभेत आपल्या राष्ट्रीय भाषेत भाषण करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे अटल बिहारी होय.
      HUMAN RELATIONSHIP IS THE BIGGEST STRENGTH OF THE POLITICS माणस कमवणे व ते काळजात जपून ठेवणे ही त्यांची हातोटी काही वेगळीच होती म्हणूनच ते चार दशक सक्रीय राजकारणात राहू शकले,दोन वेळा पंतप्रधान,नऊ वेळा लोकसभा दोनवेळा राज्यसभा गाजवू शकले ..! पाकीस्तान सारख्या देशासीसुद्धा सलोख्याचे संबध राहावेत म्हणून त्यांनी दिल्ली ते लाहोर ही बस सेवा सुरु केली,जगभरातील नेत्यांशी संवाद साधणारा व विश्वबंधुत्वासाठी अविरत झटणारा एक मुत्सदी नेता होय.
    अटलजींचे आयुष्य म्हणजे बहु आयामीत्व एक कवी,एक पत्रकार,एक उत्कृष्ठ संसदपटू असे नाना पैलू त्यांच्यात आपणास पाहायला मिळतात,ते सहज बोलत असत परंतू त्या सहज बोलण्यातून कविता तयार व्हायची हे आपण त्यांच्या एकावन्न कविता हा कविता संग्रह पाहिल्यानंतर लक्षात येते.त्यांच्या शब्दामध्ये व्यक्तीला एक नवचैतन्य,नवप्रेरणा,एक नवी उमंग,नवसंजीवनी मिळते,एक जिद्द,एक चिकाटी व संकटाला भेदण्याची धमक त्यांच्या शब्दामधून मिळते,त्यांचे बोल हे अनुभवातून येत असत,
दांव पर सब कुछ लगा है
रुक नही सकते,टूट सकते है
मगर झुक नही सकते,
   हा बाणेदारपणा त्यांच्या कारगिल युद्धाच्या प्रसंगातून दिसून येतो, संकटावर विजय मिळवायचा असेल तर तो विजय प्रथम मनात विजय मिळवला पाहिजे,नंतर मैदानात असा त्यांचा ठाम विश्वास होता,पाण्याच्या वाटेमध्ये अनेक खड्डे आले म्हणून पाणी वाहायचे कधीही थांबत नाही,तसेच अटलजींच्या बाबतीत २००१ मध्ये पंतप्रधान असताना संसदेवर अतिरेकी हल्ला झाला,परंतू हा नेता जराही डगमगला नाही,कारण त्यांच्या नेतृत्वात एक छाप होती,एक कणखरपणा व बाणेदारपणा होता,उभा भारत हादरला असताना या प्रसंगाला धैर्याने सामोरे धाडस त्यांच्यात दिसून आले.
    छोटे मन से कोई बडा नही होता,
टूटे मन से कोई खडा नही होता.. असे म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यातील नेतृत्वाचे पैलू सिद्ध झाले.
  ज्यांची स्वप्ने उदात्त व प्रामाणिक असतात ते अपयशाला कधीही घाबरत नाहीत,अटलजींचे स्वप्न मोठी आकाशाला गवसणी घालणारी होती,त्यांचा हेतू उदात्त,प्रामाणिक व हिमालयावर तिरंगा फडकवणारे होते म्हणूनच त्यांनी अणुचाचणी सारखे प्रयोग करून जगात भारताची मान अभिमानाने उंचावली.
जीवनाकडे पाहताना ते म्हणतात,
    जन्म मरण का अविरत फेरा
जीवन बंजारो का डेरा
आज यहाँ कल कहा कूच है
कौन जाणता किधर सवेरा ..म्हणून हसत खेळत जीवन जगा असे ते सांगत,खर तर महापुरुष शरीराने मरण पावतात परंतू त्यांच्या अनमोल विचाराने व कार्यकर्तृत्वाने राजकीय वचनबद्धतेने,उदारमतवादीने,जागतिकदृष्टीकोणाने व लोकशाही तत्वाशी बांधिलकीने ते अखंड अटळ राहतात...! अटल एक अटळ विचार आहे,तसाच तो राष्ट्रभक्तीचा जिवंत झरा आहे..!
मातृभूमिसे बढकर कोई चंदन नही होता,
वंदे मातरम् से कोई वंदन नही होता..!
     आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा भारतीय तिरंगा अभिमानाने डोलवला,आयुष्याचे काही श्वास बाकी असताना त्या मृत्यूलाही आपल्या बाणेदारपणे ठणकावले तु आज येऊ नकोस...तु उद्या ये आज माझ्या देशात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होतोय,माझा हा तिरंगा खाली आलेला मला कदापीही आवडणार नाही मला ते मान्यच होणार नाही,अटलजीनी एक दिवस मृत्यूवर सुद्धा विजय मिळवला व १५ ऑगस्ट आनंदात व उत्साहात साजरा झाला,हे अटलजीनी आपल्या नयन चक्षात समावून घेतला,त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट २०१८ रोजी आपल्या सर्वांचा निरोप घेतला...!!
   अशा या अटल व्यक्तिमत्वास माझे साश्रू नयनांनी विनम्र अभिवादन...!!
                                      जयहिंद ..!!
 श्री.संतोष भगवान तळेकर
प्राथमिक शिक्षक (एम.ए.डी.एड.)
                                              जि.प.शाळा खानिव,ता.डहाणू,जि.पालघर   

No comments:

Post a Comment