भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर



जेव्हा मंदिरात जाणा-या रांगा वाचनालयात जातील.....
तेव्हाच भारत जगात महासत्ता बनेल..!!     
            असे प्रखर आणि कणखर  विधान भल्या भल्यानां  विचार करायला लावून एक क्रांती घडवून आणणारे  महापुरुष... ते  नुसतेच महापुरुष नसतात तर ते एक युग असते...!आपण कायम म्हणतो ,फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार जात-धर्म या पलीकडे होते. त्यांना धर्म-जातीच्या बंधनातून मनुष्यप्राण्याला मुक्त करून त्याला माणूस बनवायचे होते. त्यांचे विचार व आचार तंतोतंत तसेच होते, त्यात तसूभरही असमतोल नव्हता. 
             शिक्षण, संघटन, संघर्ष यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या ,गावच्या वेशी बाहेर पडलेल्या,सुख म्हणजे काय..?जीवन म्हणजे काय..?अशा कितीतरी गोष्टी पासून कोसो दूर असलेला  लाखो  जन समूह...आणि या जनसमुहाला  गावच्या वेशी पासून तर थेट  गाडीच्या ए सी मध्ये ज्या महामानवामुळे  बसता आले ते मानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय...!
          त्यांनी भारताचा पाया  राज्यघटना या एका  अशा पायावर उभा केला की तो जगालाही मोहिनी घालून विश्ववंद्य झाला...! समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरतात..पुढेही ठरतील ...! अशा या थोर विचारवंतांचा युगप्रवर्तकाचा म्हणजे डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.  इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे आले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात लाडक्या भीमरावाचे नाव शाळेत दाखल केले. याच काळात बाबासाहेबांच्या आईचे मस्तक शूळ या आजाराने निधन झालेत्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले.
         इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले.इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
             अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.
           १९१३ ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले, तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही.पण या परस्परविरोधी अनुभवांचा विचार करून त्यांनी आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे मनोमन ठरवले. परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात दी प्रॉब्लेम ऑफ रूपीहा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली.
         एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.
        इ.स. १९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.
              इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’, ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय थॉटस् ऑन पाकिस्तानहा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक असण्याबरोबरच स्वत: एक वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या दख्खनचा दिवाया नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शनया नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जातीया ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली. 
                                   “साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
         सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते सुशिक्षितझाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत.
         त्यांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता. याचसाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या मनुस्मृतीया ग्रंथाचे जाहीर दहनही केले. १९१७ ते १९३५ या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला.. १९३५ मध्ये त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाहीअशी घोषणा येवला येथे केली. आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात रोज १८- १८ तास अभ्यास करणारे डॉ. आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखून होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीआणि डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटीया शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही १९२४ मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभास्थापन केली. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर १९४२ साली अखिल भारतीय शेडयूल्ड कास्ट फे डरेशनची स्थापना केली.
                हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क, घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात.
             पूर्वीच्या काळी खोती पध्दत अस्तित्वात होती. या खोती पध्दतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ती एक प्रकारची आर्थिक शोषण करणारी व्यवस्थाच होती. ही खोती पध्दत नष्ट करणारे कायदे डॉ.आंबेडकरांनी केले.
       १९४७ मध्ये डॉ.आंबेडकरांचा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाबददल भारतीय जनता डॉ.आंबेडकरांना कदापिही विसरणार नाही.विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात सक्षम संघराज्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
                १९५६ मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. (दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६., नागपूर.)
         ‘राज्यघटनेचे शिल्पकार,’  डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले.खर तर ते शरीराने जग सोडून गेले असतील परंतू त्यांचे कार्य व विचार आजही भारतीयांच्या मनावर व त्यांनी रचलेल्या राज्यघटनारुपी खांबावर हा देश कायमच विश्व वंद्य राहील..!
                   कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. त्यानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते त्या विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे समारंभपूर्वक अनावरण नुकतेच करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्या क्रमांकावर गणना झालेली विद्वानांची ती यादी शिल्पात कोरून कोलंबिया विद्यापीठात दर्शनी भागात झळकवण्यात आली आहे. त्यात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांसह अन्य राष्ट्रांच्या सहा राष्ट्राध्यक्षांचा समावेश असून त्यातील डॉ. आंबेडकर हे एकमेव हिंदुस्थानी आहेत. जगभरातील १०० विद्वानांची ती यादी तज्ज्ञांच्या एका समितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वानांची मते अजमावून तयार केली आहे. कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१३-१९१६ या काळात शिक्षण घेऊन पीएचडी. मिळवली होती. त्या विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांची संविधाने आणि कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांच्या नावाने याआधीच अध्यासनाची स्थापना केलेली आहे. आपल्या आयुष्यात समतेचा अनुभव पहिल्यांदा कोलंबिया विद्यापीठातच आपण घेतला, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंदवले आहे. 
          एकंदर डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले
 शेवटी एवढेच..शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !
         

 बावीस प्रतिज्ञांद्वारे संदेश दिला.                                                                                           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्धांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत[३९] :-
मी ब्रह्माविष्णुमहेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.      राम  कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.                 मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.                                                         देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.                                      गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.            मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.                                       मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.                    मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.                               सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.                                मी समता स्थापन करण्याचा प्रयत्‍न करीन.                                              मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.                         तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.                                       मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.                              मी चोरी करणार नाही.                                                             मी व्यभिचार करणार नाही.                                                        मी खोटे बोलणार नाही.                                                             मी दारू पिणार नाही.                                                            ज्ञान (प्रज्ञा) शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.                                                                            माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्‍या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्‍या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.                      तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.                                        आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.                                    इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो                         (संदर्भ-विकिपीडिया )                                                                                                                                                                  शिवश्री संतोष भगवान तळेकर                                                                                                                 प्रा. शिक्षक, खानिव, ता.डहाणू, जि.पालघर                                                                                     8275941474                                                                                                                   https://www.facebook.com/profile.php?id=100004853207402                            

No comments:

Post a Comment