१७ सप्टेंबर मराठवाड्याच्या
स्वातंत्र्याची सोनेरी पहाट...
एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद लुटत असताना आपलाच
काही भाग पारतंत्र्याच्या हाल अपेष्ठा सोसवत आहे याची सल तमाम भारतीयांच्या मनात
सलत होती ..
१५
ऑगस्ट १९४७ ला साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद
संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात
असलेला मराठवाडा पारतंत्र्यातच होता.स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या
हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची ती बोचरी जखम प्रत्येक क्षणा-क्षणाला बोचत
होती.
आज १७ सप्टेंबर म्हणजे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन... असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून अनेकांच्या निकरांच्या लढ्यातून निर्माण झालेला हा मराठवाडा.. आज सनई-चौघड्यांच्या
ढोल ताश्यांच्या मंगल निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मराठवाडा
मुक्ती संग्राम दिन साजरा करत असताना सर्वप्रथम धेयधुंद भावनांनी
ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य
पत्करले. अशा सर्व ज्ञात-अज्ञात बहादूर मावळ्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .....
इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या
स्मृती जिवंत आहेत, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आठवणीना उजाळा देण्याचा
हा छोटासा प्रयत्न..
भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून
१५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाला, मात्र
त्यावेळी संपूर्ण देश विविध
संस्थानांमध्ये विखुरलेला होता.
त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली.
मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर
उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल
मुल्क आसफजाह यांचे राज्य
होते.निजाम त्याला वाट्टेल ते अधिकार वापरून संस्थानातील रयतेस त्रास देत होता,आणि
याच गुलामीतून त्यांच्या जाचातून व राज्यातून मुक्त होण्यासाठी एक लढा उभा राहिला हाच
तो हैद्राबाद मुक्ती संग्राम लढा होय.या लढ्याचा उद्देश संस्थानातील रयतेस स्वातंत्र्याचा
मोकळा श्वास देऊन त्यांना भारतीय संघराज्यात सामिल करणे..!
स्वामी रामानंद तीर्थ
यांनी आपल्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु केला
त्यावेळी त्यांच्या सोबत दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या
आणि इतर अनेक नेते सामील झाले आणि हा लढा निकराने लढवला.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम
लढला गेला.
या संस्थानात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.त्यावेळची
लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती,मुक्ती
संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम
रझवी याने जनतेवर अत्याचार
सुरु केले. लोकांना राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ
लागले. त्यातच निजामाचे पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर
अमानुष अत्याचार सुरु केले. त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या
सगळ्याविरुद्ध १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध ‘पोलीस ऍक्शन’ची कारवाई केली,निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी
५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण
आला.हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील
अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.मराठवाड्याला खरे स्वातंत्र्य मिळाले.त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट
तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली.
आज भारताला स्वातंत्र्य मिळवून ७१ वर्ष झाली तरीही माझा मराठवाडा सर्व
बाबतीत कायमच दुर्लक्षित राहिला,मराठवाड्याने या देशाला हिमालयाच्या उंचीशी
स्पर्धा करणारी माणसे दिली.एवढेच नव्हे, तर मराठवाड्याच्या या कसदार भूमीने
या राज्याचे, देशाचे
नेतृत्व करणारे मराठी बाण्याचे माणस दिली एक व्याख्याता म्हणतो,किल्ले आमच्या
भागात आहेत,परंतू मावळे मराठवाड्यात आहेत,मराठवाड्याने कायमच मावळा म्हणून राहायचे
का..?
आज मराठवाड्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे,हाताला काम
नाही,बेरोजगारी वाढत चालली आहे,कारखानदारी उपलब्ध नाही,नोकरी धंदा नाही,उसतोडणी
साठी गावोगाव ओसाड पडत आहेत,तरुण एक तर कोण्या एखाद्या राजकीय पक्ष्याच्या दावणीला
बांधून आपली उपजीविका भागत आहेत तर काही शहराकडे आकर्षिले जात आहेत..या सर्वांमुळे
मराठवाडा सर्व बाबतीत मागे पडत चालला आहे याकडे कोण्याही राजकीय नेत्याचे लक्ष
नाही.जो तो आपलीच पोती भरण्यात व्यस्त आहे.गरिबीची जाणीव कोणालाही नाही.
आज मराठवाडा मुक्ती संग्राम
दिनानिमित्त एवढेच करूया,या मुक्तीच्या लढ्यासाठी ज्यानी आपले आयुष्य वेचले, त्याची जाणीव ठेवून शेवटी आपणच आपले उद्धारक होऊन एक
सशक्त मराठवाडा उभा करूया मराठवाड्यातील, सामाजिक आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सुजलाम सुफलाम कृषी
संस्कृतीच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध होऊन देवगिरीचे ते वैभव पुन्हा एकदा सर्वांच्या
सहकार्यातून उभा करून विकासाचा विजयी रथ पुढे घेऊन जाऊया..!
श्री.संतोष भगवान तळेकर
(एम.ए.डी.एड,डी.एस.एम,सी.पी.सी.टी)
8275941474
No comments:
Post a Comment