भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

आदर्शांचा मानबिंदू म्हणजे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम...!!


आदर्शांचा मानबिंदू म्हणजे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम...!!
          पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेंव्हा सामान्य ते असामान्य ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हटले तर,
     Success when our signature changes to autograph this makes the Success.
      तामिळनाडूतल्या पवित्र रामेश्वरम् इथं 15 ऑक्टोबर 1931 रोजी एका सामान्य कुटूंबात डॉ.कलाम साहेबांचा जन्म झाला.त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होय. वडिलांचा त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव होता,रामेश्वरम् च्या मंदिराचे मुख्य पुजारी आणि तिथल्या चर्चचे फादर हे कलामांच्या वडिलांचे जीवलग मित्र असल्याने अगदी लहानपणापासून त्यांच्यावर सर्वधर्मसमभावाचे संस्कार झाले आणि आयुष्यभर त्यांनी ते पाळले. सर्व धर्मांपेक्षा मोठा धर्म हा `मानव धर्म` आहे हे त्यांनी आपल्या आचरणानं सिद्ध करून दाखवलं.
      त्यांचे घर रामेश्वर च्या मशीद असलेल्या रस्त्यावर होते.तर पवित्र रामेश्वर दहा मिनिटाच्या अंतरावर होते ते लहान असताना वडिलांबरोबर नमाजला जात असत.तेव्हा त्यानी वडिलांना प्रार्थनेचा अर्थ विचारला होता.प्रार्थनेचा अर्थ त्यांच्या वडिलांनी खूप सुंदर उत्तर दिले होते "प्रार्थनेमध्ये,नमाज पढण्यामध्ये गूढ असे काही नाही .एकत्र येवून नमाज पढताना माणसामाणसांमधील भेदभाव नाहीसे होतात .संपत्ती ,वय ,जातधर्म ,वंश ,शरीर सर्व काही विसरून त्या अगाध विश्व शक्तीशी एकरूप होतो."
.         त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे निधन झाले,कुटुंबाची परिस्थती आणखीखालावली, डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून दोन पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
   त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.त्यानंतर अब्दुल कलाम यांचा 1958 ते 63 या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
     स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.डॉ.साहेबांनी अशीच उज्जल भारताच्या विकासाची वीस वर्ष पुढील स्वप्न त्यांनी पहिले व प्रत्येक्षात उतरवली, विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता.आणि तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासला.
      आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.
     अग्नी क्षेपणास्र उड्डाण अयशस्वी झाले त्यावेळी त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले,परंतू डॉ.साहेब जराही डगमगले नाहीत,अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत हे त्यांनी त्यांच्याच अनुभवातून ओळखले होते,आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.आपल्या कष्टातून राजस्थानच्या वाळवंटात बुद्ध हसला,अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाणाने भारताचं सामर्थ्य कित्येक पटीनं वाढवले.
    डॉ.साहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ते लेखक आणि कवीही होते...साहित्य, संगित, पर्यावरण हे त्याचे आवडीचे विषय.'विंग्ज् ऑफ फायर','व्हिजन 2020', 'इग्नायटेड माईंड' ही त्यांची पुस्तकं प्रचंड गाजली.
   माझी खुर्ची ही इतरांपेक्षा वेगळी आहे हे लक्षात येताच लगेच आपली खुर्ची बदलून सर्व सामान्य खुर्चीवर बसणारे,राष्ट्रपती पदाच्या शपथविधी कार्यक्रमास आपल्या नातेवाईकास साध्या ट्रेन मधून घेवून जाणारे डॉ.साहेब..,राष्ट्रपती बनल्यानंतर डॉ.साहेबानी केरळच्या राज भवनात सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एक चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक. असे हे सामान्यातील असामान्य कर्तुत्व विरळच ...!
       मी मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहिर करु नका तर एक दिवस जास्त काम करा,ही त्यांची आपल्या सेवेप्रती,देशाप्रती असलेली निष्ठा एक संस्कार करून जाते.देश, समाज, युवक यांचा विकास हेच त्यांच्या आयुष्याचं मिशन होतं...याच मिशनवर असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मृत्यू हा अटळ आहे...तो कुणालाच चूकत नाही...पण काम करताना मृत्यू यावा असे डॉ.साहेब नेहमी म्हणायचे.शिलाँग येथे सोमवारी संध्याकाळी अशाच एका कार्यक्रमात  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना हृदय विकाराचा झटका येवून डॉ.साहेब आपल्यातून निघून गेले,खरे तर ते शरीररूपी आपल्यातून गेले असतील परंतू मनाने,त्यांच्या संस्काराने,आभाळा एवढे केलेल्या कार्य कार्तुत्वाने ते सतत आपल्याला प्रेरणा देत राहतील.
   आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा भारतीय तिरंगा अभिमानाने डोलावणाऱ्या कलाम साहेबांना भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
      अनेक मार्गदर्शक पुस्तकांतुन आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणाऱ्या ह्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस व वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच…!
 श्री.संतोष भगवान तळेकर
प्राथमिक शिक्षक (एम.ए.डी.एड.)

No comments:

Post a Comment