भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

14 ऑगस्ट हुतात्मा दिन...!!

                 14 ऑगस्ट हुतात्मा दिन...!!

   जब देश में थी दीवाली, वो खेल रहे थे होली                    
  जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...
      आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतीकारक देश भक्तांचा फार मोठा वाटा आहे.आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी अनेक कष्ट उपसले आहेत. काहींनी वैभवाचा त्याग करून सामान्य जीवन पत्करून देशसेवा केली तर काहींनी तर आपले जीवनच देशाला समर्पित केले.या स्वातंत्र्य समरात पालघर तालुक्‍यातील पाच तेजस्वी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजाविरुद्ध पालघर येथे 14 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करले,म्हणून त्यांच्या बलिदानाच्या आठवणींचा आजचा दिवस..                   सुमारे दीडशे वर्षे चालू असलेल्या भारताच्या स्वातत्र्य आंदोलनातील 'छोडोभारत' हा निर्णायक टप्पा होता. महात्मा गांधी सारख्या असामान्य नेत्याच्या नेतृत्वा खाली सुरू झालेल्या या निशस्त्र लढ्यात देशभरातील लक्षावधी जनता उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती. हजारो युवकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.14 ऑगस्ट 1942 रोजी "चले जाव' चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध मोर्चा काढल्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता, 'देशाच्या स्वातंत्र आंदोलनात मी उडी घेतोय, परत आलो तर ठीक अन्यथा तुझा मुलगा देशासाठी कामी आला', असा आपल्या घरी गावात निरोप धाडून लढ्यात उतरलेले सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे (26वर्षे) तसेच राष्ट्रभक्तीच्या संस्कारात वाढलेले ध्येयवादाने भारलेले नांदगाव येथील  गोविंद गणेश ठाकूर (17 वर्षे) व पालघर वास्तव्यास असलेला उत्तर प्रदेशीय धाडसी नवविवाहित  सैनिक रामप्रसाद भीमशंकर तिवारी (17 वर्षे), आपल्या आजारी पत्नी करिता औषधे आणण्या करिता घराबाहेर पडलेला मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी (24वर्षे) व प्रसूत झालेल्या पत्नीची विनंती झुगारून ताटावरून उठून हौतात्म्य पत्करलेले शिरगावचे सुकूर गोविंद मोरे (22 वर्षे) हे पाचयुवक.समस्त जनतेच्या कणखर स्वातंत्र्य प्रेमाचे ज्वलंत प्रतिनिधी. त्यांची अलोट देशभक्ती, कार्याविषयीची तळमळ, दृढनिर्धार, स्वार्थ त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती. त्यांच्या या थोर गुणांचे मोल शब्दात सांगूच शकत नाही, या थोर क्रांतीकारकांचा त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता.
  “ दिन खून के हमारे, यारों भूल जाना।
खुशियों मे अपनी हम पे आँसू बहाते जाना।।’’
     अशा पाच थोर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 1944 पासून जिल्ह्यातील नागरिक आण‌ि शाळकरी विद्यार्थी मूक मिरवणुकीने उभारलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी श्रद्धांजली वाहिली जाते. या दिवशी पालघर शहरामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळला जातो. विशेष म्हणजे येत्या 14 ऑगस्टला या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने हा हुतात्मा दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत.. पालघर तालुक्यातील व जिल्ह्यातील  जनतेने 75 वर्षे मनात श्रध्दापूर्वक तन करून ठेवलेल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...आज हुतात्मा दिनाच्या दिवशी मला त्यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या ओळी सार्थ वाटतात:                     'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, 
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'
  !!!जय हिंद...जय हिंद..जय हिंद की सेना....!!!
                                         
   
                     
                                                         शिवश्री.संतोष भगवान तळेकर
       प्रा.शिक्षक जि.प.शाळा खानिव,ता.डहाणू,जि.पालघर
    8275941474                                                                                                               हा लेख PDF साठी  DOWNLOAD   येथे क्लिक करा.                 

No comments:

Post a Comment