भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

माझा पालघर

                                           
   माझा पालघर
नमस्कार विदयार्थी मित्रहो,
                आज पालघर म्हणजे आपल्या जिल्ह्याचा वर्धापन दिन आपल्या आनंदाचा दिवस या आनंदात सहभागी असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सदस्य,ग्रामस्थ, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक,गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो..
         खरं तर एखादा पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडावा आणि त्याने  आकाशात उंच उंच भरारी घ्यावी,अगदी तसाच काहीसा आनंद आज मला गेली दोन वर्षांपासून होतो आहे कारण माझा पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून  स्वतंत्र झाला तो आजच्याच म्हणजे 1 ऑगस्ट 2014 दिवशी..बालमित्रांनो आपला पालघर जिल्हा महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून उदयास आला, त्यावेळची तत्कालीन मुख्यमंत्री मा पृथ्वीराज  चव्हाण यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने ही पालघर विभाजनची घोषणा केली हा माझा जिल्हा पालघर,डहाणू,तलासरी,जव्हार,मोखाडा,वाडा, विक्रमगड,वसई अशा तालुक्याने व्यापलेला आहे, पालघर जिल्हा तसा पहिला तर आदिवासी बहुल आहे,तसेच सागरी नागरी व डोंगरी असा त्रिवेणी संगमाणे वसलेला आहे.
              माझ्या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत,अनेक थोर पुरुषांनी येथे जन्म घेऊन या भूमीस पवित्र केले आहे,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने या भूमीचे मोल कित्येक पटीने वाढले आहे,आमचे आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा आम्हाला कायमच राष्ट्रभक्तीचे धडे देतात,स्वातंत्र्य समरात अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची होळी केली,त्यांची आठवण म्हणून पालघर येथे हुतात्मा चौक उभा आहे,वसईचा किल्ला चिमाजी आप्पाच्या पराक्रमाची साक्ष देत आजही ताठ बान्यांन उभा आहे जव्हारचा राजवाडा मुकणे राजाचे वैभवाची साक्ष देतो,तर शिर्पामाळ शिवरायांनी सुरतेवर स्वारी करतानाघेतलेला विसावा घेतल्याची खून जपून आहे,डहाणू फोर्ट आजही तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी तहसील म्हणून सज्ज आहे,तर अर्नाळाची तटबंदी सागरी सरंक्षण करताना दिसतो.
       माझ्या जिल्ह्याची वारली पेंटिंग तर नादच खुळा..ही चिञकला अवघ्या जगामध्ये सुवर्णक्षराने चित्रित केली गेली आहे,पालघर नैसर्गिक दृष्ट्या अगदी सुजलाम सुफलाम असा आहे,येथे नारळी, चिकू, ताड,फणसाच्या बागा आहेत,जव्हार तर मिनी महाबळेश्वरच..
           शिक्षण क्षेत्रात अनुताई वाघ ,ताराबाई मोडक, पूज्य आचार्य भिसे सारख्या महामानवांनी रणशिंग फुंकून पाड्या पाड्यावर शिक्षणाची गंगोत्री वाहिली आहे.
         आमची संस्कृती पहावयाची असेल तर आमचे लग्न सोहळा,होळीच्या सणाच्या वेळी पहा आमचा तारफा नृत्य  नुसते कानावर पडले तर ठेका धरल्याशिवाय राहवत नाही,आमचा हा असा विविधतेने नटलेला हा पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य घटक म्हणून प्रगती साधत आहे,माझी व माझ्या सारख्या सर्वसामान्यांची होत असलेली त्रेधा तिपिट पालघर जिल्ह्यामुळे थांबली आहे,आम्ही पूर्वी जिल्ह्या पासून कोसो दूर होतो,त्यामुळे जिल्हा म्हणजे काय? तेथे काय असते ?या गोष्टी आमच्या कित्तेक पिढ्यान माहीतही झाले नाही,परंतू आता आम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचू शकतो,वेळ,पैसा व मेहनत पालघर जिल्हा झाल्यामुळे कमी झाली आहे.
            अहो पालघर जिल्हा वेगळा झाला साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या परंतू आपल्या स्वातंत्र्या बरोबर  जबाबदाऱ्या खूप वाढल्या,कारण आपल्याला अनेक साहस करावे लागतील,अनेक प्रयोग करावे लागतील, जिल्ह्याच्या दिमाखदार प्रगतीसाठी जिल्ह्यात समता, एकता, बंधुता ,असणं गरजेचं आहे. जिल्ह्यातील गरीबी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, अशिक्षितता, बेरोजगारी म्हणजेच प्रगतीतले अडथळे आहेत. जिल्ह्यात दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करायला हव्यात. वस्तूनिर्मितीची वाढ, कौशल्य विस्तार त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते.विकसित पालघर म्हणून वाटचाल करण्यासाठी प्रत्येकाने पालघर माझा आहे याच दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे.सगळ्यांना शिक्षणाचा समान अधिकार मिळाला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करताना हे क्षेत्र माझं आहे, ही भावना मनाशी बाळगली पाहिजे. सध्याची बहुतांश तरुण मंडळी कसल्या ना कसल्या व्यसनाच्या आहारी गेलीत. जर विकास करायचा असल्यास सर्वात प्रथम व्यसनातून मुक्त करण्याची गरज आहे. माझ्या पालघर जिल्ह्याची निम्म्यापेक्षा जास्त प्रगती ही तरुणवर्गाच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
   पालघर जिल्हा  अनेकांच्या त्याग तपस्येची गाथा आहे. अगणित महापुरुषांनी , जिल्ह्याच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला स्वतंत्र पालघर म्हणून  मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली.
   बालमिञानो,स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र प्रसंगी, माझ्या सर्व बंधु भगिनींना मी अनेक शुभेच्छा देतो..! जय हिंद..जय महाराष्ट्र..!!!                                              
                                                                                               
                   
     
      श्री.संतोष भगवान तळेकर
  जि.प.शा.खानिव, केंद्र.कासा,
 ता.डहाणू, जि. पालघर                                8275941474

                                              pdf  साठी    DOWNLOAD  क्लिक करा.                                                      




             

No comments:

Post a Comment